Monday, September 30, 2019

माझ्या जीवनातील महाप्रलयकारी भूकंप


माझ्या जीवनातील महाप्रलयकारी भूकंप

३० सप्टेंबर १९९३ आठवण आजीची





महाप्रलयकारी किल्लारी भूकंप २६ वर्ष झाली पण आजही त्या दिवशीचे भयाण चित्र माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही.मला चांगलं आठवत मी इयत्ता पहिलीत शिकत होतो.गणेश विसर्जन करुन लोकं येऊन झोपली आणि नियतीने घात केला. 
              दि.३० सप्टेंबर १९९३ पहाटे ३ वा.५६ मि.भूकंप झाला.आणि सर्व होत्याच नव्हतं झालं.माझ्या गावातील एकही घर असे राहिले नव्हते कि ते कोसळले नसेल. प्रत्येक घरातून १ ,२, तर काहीही अख्खी घरे घरातील माणसे दगडाखाली येऊन संपली होती. सर्वत्र रडारड आरडाओरड कान किर्र करून सोडणाऱ्या किंकाळ्या आजही कानात ऐकायला येतात. 
            माझ्या घरातीलही माझी आजी सकाळी पहाटे खूप लवकर उठून सडा सारवण करत.आजोबा पाणी आणण्यासाठी घराबाहेर गावाच्याकडेला गेले होते. व आचानक नियतीने घाला घातला भूकंप झाला. माझी आजी दोन घराच्या आतील जागेवर सडा सारवण करत असताना दोन्ही घराच्या दगडी भिंती माझ्या आजीवर कोसळल्या.व आजोबा गावाबाहेर गेले होते त्यामुळे ते वाचले.मात्र माझी आजी तीन दिवस सर्वजण शोधत होते.अशा होती कोठेतरी अडकली असेल जिवंत असेल म्हणून सर्वजण शोधत होते. शेवटी तीन दिवसानंतर दगडांच्या खाली माझी आजी सापडली.पण तीचे प्राण मात्र राहिले नव्हते.त्यानंतर सर्व गावातही अशीच परिस्थिती होती.घरात मी माझा भाऊ आई वडिल झोपेत होतो.भूकंप झाला तेव्हा मी ही झोपेत होतो.माझ्या आईचा एक पाय पूर्ण अडकला होता.तशाच आईने मला व माझ्या भावाला आवाज दिला.तसेही आम्ही दोघे जागी झालो.(मी पहिली होतो मोठा भाऊ दुसरीत होता).आम्हाला जाग आली तेव्हा काय झालंय हे काहीच कळलं नाही.सुदैवाने आमच्या अंगावर काहीही पडलेले नव्हते.लगेच आम्हा दोघांना गावाबाहेर सर्व लोक एकत्र जमले होते अशा सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. 
         सकाळ झाल्यानंतर भूकंपाने केलेला महाप्रलय सर्वांना दिसू लागला. जिकडे पाहावे तिकडे हाहाकार हृदय सुन्न करणाऱ्या किंकाळ्या  रडारड महाभयानक आक्रोश दुःख कोसळलं असं कि संपूर्ण गाव दुःखमय झालं.  कोणाची आई गेली कोणाचे वडील गेले कोणाची आजी कोणाचे आजोबा तर कोणाची लहान लहान लेकरं गेली. का कोणास ठाऊक पण नियतीने अतिशय निर्दयपणे या सर्वांना गिळंकृत करून टाकले. 
          अशी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील मिळून ५२ गावे उद्ध्वस्त झाली. त्यातीलच एक माझं नांदुर्गा हे गाव. अधून मधून भूकंपाचे धक्के चालूच होते. बघता बघता ही बातमी जगभर पसरली व जगभरातून तात्काळ मदत यायला सुरुवात झाली.कोणाच्याही घरात काहीही राहिले नव्हते. लहान लहान मुले म्हातारी माणसे सर्वांना खाण्यासाठी अन्न अंगावर घालण्यासाठी कपडे,थंडीपासून बचाव करण्यासाठी लागणारे सर्व लागेल ती मदत जगभरातून येत होती. फक्त भेटत नव्हती ती जमीनीखाली गाडली गेलेली माणसं

जगभरातील त्या सर्वांचे मदतकार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्यांचे कोटी कोटी आभार.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तसेच या महाप्रलयकारी भूकंपात आपले प्राण गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रध्दांजली
💐💐💐💐💐💐💐💐💐
*लेखन*
*श्री.प्रमोद दिगंबर मोरे*
*मु.पो.नांदुर्गा (भूकंपग्रस्त)*
*ता.औसा जि.लातूर*
*9404566070* 

सविस्तर बातमी फेसबुकवर
https://www.facebook.com/100002875163052/posts/1658536497585506/

3 comments:

  1. भावपूर्ण श्रध्दांजली

    ReplyDelete
  2. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  3. महाराष्ट्रातील आजवरची सर्वात दुःखद घटना म्हणजे किल्लारी भूकंप...

    ReplyDelete